हायलाइट्स:
- भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं पुन्हा भाष्य
- राज ठाकरे यांनी परप्रांतीयांसमोर केलेल्या भाषणाबाबतही मांडली भूमिका
- नव्या युतीचा मार्ग खडतर?
राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांसमोर केलेलं संपूर्ण भाषण मी ऐकलं. त्या भाषणाची क्लिप कोणी पाठवली, या प्रश्नाला काही अर्थ नाही. एखाद्या शहरात काय उपयोग होईल त्यापेक्षा एखाद्या निर्णयाचा संपूर्ण राज्यात काय परिणाम होईल, याचा विचार करून आम्हाला मनसे सोबतच्या युतीचा विचार करावा लागेल. केवळ पुण्या-मुंबईचा विचार करून चालणार नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
नव्या युतीचा मार्ग खडतर?
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जवळीक केली. त्यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटही झाली. या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला. मात्र चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंच्या परप्रातीयांबाबतच्या भूमिकेबद्दल वक्तव्य करत ही युती होणं तितकं सोपं नसल्याचं अप्रत्यक्षपणे सुचवलं आहे.
शहा-पवार भेटीवर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘पवारांचे वैशिष्ट्य आहे की राज्यातील विविध विषयांसाठी ते दिल्लीतील वेगवेगळ्या नेत्यांना भेटत असतात, त्याप्रमाणे ते अमित शहा यांना सहकारासाठी भेटले आहेत. दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती नाही.’
दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधला. केवळ घोषणा करायची, त्यानंतर काहीच करायचे नाही, हे राज्य सरकारचं वैशिष्ट्य आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Recent Comments