जुलैचा पंधरवडा उलटला, तरी प्रतिकूल वातावरणामुळे पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर अरबी समुद्र ते दक्षिण आंध्र किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर राज्याच्या बहुतांश भागांत जोरदार पाऊस आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते, उकाडा वाढला होता. शहराच्या विविध भागांत अधूनमधून पावसाच्या सरींनी हजेरी लावली. दिवसभरात कमाल ३०.६ आणि २२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. घाट माथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक महाबळेश्वरमध्ये ३९ मिलिमीटर पाऊस पडला.
Recent Comments